श्री संत रामदास स्वामी म्हणजे बलोपासनेचे महत्त्व पटविणारे आणि वेगळ्या विचारांची शिदोरी देणारे संत. त्यांनी लिहिलेला दासबोध हा ग्रंथ म्हणजे व्यक्तिमत्त्व विकास आणि व्यवस्थापन शास्त्राचे धडे असलेली गुरुकिल्लीच. आज (७ मार्च २०२१) दासनवमी आहे. त्या औचित्याने, ‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ ही लेखमाला पुन्हा प्रसिद्ध करत आहोत. ‘मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अॅग्रिकल्चर’चे माजी संचालक श्रीनिवास रायरीकर यांनी ही लेखमाला लिहिली आहे. त्यांनी अनेक वर्षं हा ग्रंथ अभ्यासून ‘दासबोध : नेतृत्व आणि व्यक्तिविकास’ या विषयावर विविध कंपन्यांत १२००हून अधिक कार्यशाळा घेतल्या आहेत. ........
संत रामदास हे शिवाजी महाराज व संत तुकाराम यांचे समकालीन. त्यांना समर्थ या नावाने महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण देशात व परदेशातही ओळखले जाते. इ. स. १९०८मध्ये जन्म व इ. स. १६८२मध्ये निर्वाण. या ७४ वर्षांच्या आयुष्यात संत रामदासांनी आध्यात्मिक क्षेत्रातच नव्हे, तर सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात जे अपूर्व योगदान दिले, त्यामुळेच त्यांच्या हयातीतच त्यांना लोक ‘समर्थ’ म्हणजे एक मोठा किंवा सक्षम (able) नेता (Leader) म्हणून ओळखू लागले व त्यांना समर्थ हेच नाव जास्त शोभू लागले, ते त्यांनी नेता म्हणून किंवा संघटनात्मक भव्य व यशस्वी कार्य केल्यामुळेच! समर्थ रामदासांचे आयुष्याचे तीन मुख्य भाग आहेत. त्यातील पहिली १२ वर्षं बालपणाची. ‘सावधान’ हा शब्द कानावर पडल्यानंतर ते लग्नमंडपातून पळून गेले. लक्षावधी लोकांचा मोठा संघटनात्मक संसार करण्यासाठी जणू काही ही योजना होती. एकाने मला विचारले, ‘का हो! रामदास स्वामी बोहल्यावरून पळून गेले व स्वतःच संसारातून बाजूला गेले. असे असताना आपल्याला ते ‘संसार नेटका कसा करावा’ हे कसे सांगतात?’ त्याला उत्तर असे, ‘आपल्या सामान्य माणसांच्या संसाराच्या कल्पना संकुचित असतात. नवरा, बायको, मुले, फार झाले तर आई-वडील, या पलीकडे आपली संसाराची कल्पना जात नाही. समर्थांनी वयाच्या आठव्या वर्षी आईने विचारलेल्या ‘शांत काय बसलास आणि विचार कसला करतो आहेस’ या प्रश्नाला ‘आई! चिंता करितो विश्वाचि’ असे उत्तर दिले. वयाच्या आठव्या वर्षी आपल्याला आयुष्यात काय करायचे आहे, याचे स्पष्ट चित्र ज्याच्यापुढे होते, अशा दूरदृष्टी असणाऱ्या असामान्य व्यक्तींचा संसार खूप मोठा असतो. त्यांनी तो अतिशय भव्य व नेटका, उत्तम गुणवत्तेचा कसा व का केला, हे आपण थोडक्यात पाहू.
समर्थ रामदासांच्या
दासबोधासारख्या ‘ग्रंथराज’ समजल्या जाणाऱ्या ग्रंथात उत्तम नेतेपदाची लक्षणे काय, उत्तम कार्यकर्ता कसा असतो, उत्कृष्ट कार्यसंस्कृतीचे वा गुणवत्तेच्या कामाचे निकष काय, संघटन म्हणजे काय, ते वाढवायचे कसे, बांधायचे कसे, (Team Work) सांघिक कार्य करताना कसे वागावे व कसे वागू नये, संघबांधणी (Team Building) कशी करावी, (Deligation) कसे करावे, नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी कसे वागले पाहिजे, ‘ नि:स्पृहता’ ठेवून भव्य काम कसे करावे, किंबहुना (Global) जागतिक पातळीवर भव्य संघटन यशस्वीपणे कसे चालवावे, हे तर लिहिले आहेच; पण व्यवस्थापनशास्त्राची आत्ताची व यापुढे येऊ घातलेली अनेक तत्त्वे समर्थ रामदास या ग्रंथात अचूकपणे व तपशीलात लिहू शकले, हे पाहिले, की ‘दासबोध’सारखा ग्रंथ हा व्यवस्थापन शास्त्राच्या किंवा नेतृत्व शास्त्राच्या ग्रंथांमधला एखादा अव्वल दर्जाचा ग्रंथ वाटतो. हे कशामुळे, कसे आणि नेतृत्व व कार्यसंस्कृतीविषयीच्या कोणत्या महत्त्वाच्या संकल्पना समर्थांनी दासबोधात मांडल्या आहेत, ते आपण पुढे काही प्रमाणात तपशीलवार पाहणार आहोत. आजच्या आधुनिक जीवनात कंपनी व्यवस्थापनात, जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये आपल्या वैयक्तिक जीवनात या साऱ्याचे स्थान काय आहे व आपल्या आधुनिक जीवनातल्या महत्त्वाच्या समस्या काय आहेत, त्यांना समर्थांनी दासबोधात मुळातूनच उत्तरे दिली आहेत. तसंच व्यक्ती, नेता, कर्मचारी, कुटुंब व समाजाचा घटक म्हणून आपला विकास कसा साधू शकतो, याबद्दलही लिहिलं आहे. मी Super Habits of Dasbodh नावाच्या कार्यशाळेतून संपूर्ण दिवस ज्याचा ऊहापोह करून आपल्या प्रत्येकासाठी प्रत्यक्ष कृती योजना ज्याची त्याच्याकडून करून घेत असतो, त्यात मुख्यत: कठोर आत्मपरीक्षण (Self Analysis) हे हत्यार वापरले जाते. आपल्या आयुष्याच्या सर्व अंगांना स्पर्श करून आंतर-आयुष्य, कामावरील, व्यवसायासंबंधीचे आयुष्य व परस्पर मानवी संबंधांविषयीचे आयुष्य या साऱ्यांमध्ये मनाच्या खोल पातळीवर काम करून स्वतःच्या गुणदोषांचे विश्लेषण करून ‘बदल व विकासाची’ आत्मग्वाही (Self commitment) देणे याचबरोबर एक तपशीलवार कार्ययोजना (Action Plan) तयार करण्याचे काम करीत असतो. या कार्ययोजनेच्या अंमलबजावणीमुळे आपल्या जीवनात अनेक चांगले बदल होतात वे मुळातून असतात. या कार्यक्रमात ISO-9000मधील गुणवत्ता सुधारणेच्या संकल्पना, तसेच अमेरिकन व्यवस्थापनतज्ज्ञ प्रो. डेमिंग यांची प्रसिद्ध PDCA Cycle (Plan-Do-Check-Act) अशा आधुनिक संकल्पनांचा प्रत्यक्ष उपयोग करून संपूर्ण आयुष्याचीच गुणवत्ता कशी वाढेल (ज्यावर समर्थ रामदासांचा पूर्ण भर आहे) याची अत्यंत व्यवहारी अशी योजना तयार केली जाते.
या योजनेची ताबडतोब आपल्या आयुष्यात अंमलबजावणी सुरू करणे व प्रत्यक्षात बदल व विकास घडवणे, या सूत्रावर समर्थांच्या दासबोधातील अनेक ओव्या व संकल्पनांच्या भक्कम पायावर ही कार्यशाळा आधारित आहे. तो अत्यंत तपशीलात काम करण्याचा भाग झाला. परंतु या कार्यशाळेतील समर्थ रामदासांच्या नेतृत्वविकास, कार्यसंस्कृती, संघटनात्मक विचार, व्यक्तिविकास यातील काही संकल्पन आपण या लेखमालेतून पाहणार आहोत.
(‘मॅनेजमेंट गुरू - दासबोध’ या लेखमालेतील पुढच्या लेखात पाहू या दासबोध ग्रंथातील व्यवस्थापन कौशल्य आणि नेतृत्व विकासविषयक मुख्य संकल्पनांबद्दल...)
(या लेखमालेतील सर्व लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)